जळगाव : प्रतिनिधी
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जिवे ठार मारण्याची धमकी असणारा मेल पाठविण्यात आला असून, सीएमओ कार्यालयाने त्याची दखल घेत तो गृहसचिवांसह जळगाव पोलिसांना पाठविला आहे.
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात अनेक अधिकाऱ्यांनादेखील असे धमकीचे मेल आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तसा मेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयीन मेल अकाउंटवर पाठविला आहे. गृह खात्याने त्यावर चौकशी करीत तो जळगाव पोलिस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, जळगाव जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, महाराष्ट्र पोलिसांच्या मेलवर पाठविला.
जिल्हाधिकाऱ्यांना मारण्याची धमकी देण्यासह १ मे २०२५ नंतर आम्ही आक्रोश मोर्चा काढू. भालेराव भाऊच्या खुनाचा बदला घेऊ, असे मेलमध्ये नमूद आहे. तसेच यापूर्वी पाडलेल्या एका धार्मिक स्थळाचाही उल्लेख आहे.
मेल आलेल्या ई-मेल आयडीचा तांत्रिक तपास सायबर तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. मेलमधील भाषा पाहिली तर ती स्थानिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर व्यक्ती लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.