जळगाव : प्रतिनिधी
कर्ज फेडण्यासाठी घेतलेले हातउसनवारीचे पैसे देण्याच्या तणावात असलेल्या लीलाधर जयराम पाटील (५०, रा.भोकर, ता. जळगाव) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील भोकर येथे सोमवारी (३१ मार्च) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर पाटील यांच्यावर ४० ते ५० हजार रुपयांचे कर्ज होते. त्यांनी इतरांकडून हातउसनवारीने पैसे घेऊन कर्ज फेडले. मात्र, इतरांची रक्कम कशी द्यावी, या चिंतेत ते होते. सोमवारी (३१ मार्च) घरातील सर्व जण शेतात गेलेले असताना घरी एकटेच असलेल्या लीलाधर पाटील यांनी गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच, त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी आहे.