नागपूर : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुढीपाड्व्यानिमित्त नागपूर दौऱ्यावर येत असतांना आता कॉंग्रेसच्या नेत्याने टीकास्त्र सोडले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा करिष्मा होता. ही गोष्ट पटल्यामुळेच मोदी उद्या नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात ते संघाच्या रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरासह ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवतही हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान असताना संघाच्या मुख्यालयात जाणारे मोदी पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला येत आहेत. भाजपच्या विजयात नरेंद्र मोदी यांचा नव्हे तर संघाचा करिष्मा असल्याचे आता त्यांना पटत आहे. त्यामुळेच ते संघ मुख्यालयात येत आहेत. पंतप्रधान मोदी 12 वर्षानंतर संघ मुख्यालयात येत आहेत. म्हणजे त्यांचा प्रवास सूर्योदपासून सूर्यास्ताकडे जात आहे असेच म्हणावे लागेल, असे ते म्हणालेत. संघाचा 100 वर्षांचा इतिहास हा दोन समाजांत दरी निर्माण करणारा आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी संघ व मुस्लिम लीग काही काळासाठी एकत्र आले होते. संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदलते.
संघाचा मूळ अजेंडाच विभाजनाचा आहे. कर काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन चालणारी संघटना आहे. याऊलट संघाची विचारधारा विशिष्ट विचाराला घेऊन चालणारी आहे. त्यामुळे 100 वर्ष पूर्ण होत असल्याने संघाची पुढील भूमिका बदलेल अशी अपेक्षा आहे, असेही विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले.