जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यासह जळगाव शहर परिसरात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून शुक्रवारी, २८ मार्च रोजी रतिलाल अंकुश भिल (४३, रा. नंदगाव, ता. जळगाव) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतमजुरी करणारे रतिलाल भिल हे मोहाडी येथील मूळ रहिवासी आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते कामानिमित्त नंदगाव येथे राहत होते. एका शेडजवळील झाडाला गळफास घेतला. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित व दोन अविवाहीत मुली आहेत.