मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील तरुण पोलीस भरती होण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या तरुण-तरुणीसाठीं महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे. यानुसार, एकूण १०,००० पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. सध्या उन्हाळ्याचे तीव्र तापमान आणि जूनपासून सुरू होणारा पावसाळा यामुळे भरती प्रक्रिया गणेशोत्सवानंतर १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून सुमारे ११ ते १३ लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. मागील एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या पोलिस भरतीत १७ हजार ४७१ जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज आले होते. त्यामुळे यावेळीही मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल मोठ्या प्रमाणावर तैनात राहणार असल्याने, भरती प्रक्रिया त्यानंतर सुरू होईल. १५ सप्टेंबरनंतर प्रथम मैदानी चाचणी होईल आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल.
भरती प्रक्रियेचे मुख्य टप्पे:
• एकूण पदे: १०,०००
• मैदानी चाचणी सुरू होणार: १५ सप्टेंबरनंतर
• अंदाजित अर्ज: ११ ते १३ लाख
• भरती प्रक्रियेचा कालावधी: ४ महिने
• मैदानी चाचणीतील निवड प्रमाण: १:१० (एका जागेसाठी १० उमेदवार)
भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी, उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकच अर्ज भरता येईल. जर एखाद्या उमेदवाराने दोन ठिकाणी अर्ज केला आणि त्याची निवड झाली, तर त्याला अपात्र ठरवले जाईल.