मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती सरकारवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, “मूळ विषय बाजूला राहिले आणि लोकांना बाकीच्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जात आहे. संपूर्ण विधानसभेतच खोक्याभाई भरले आहेत. एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात? मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत. त्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन,” असेही ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना टोला लगावला. “तुम्ही एका खोक्याभाईचे काय घेऊन बसला आहात सर्व विधानसभा खोक्याभाईंची आहे,” अशा शब्दांत राज यांनी महायुतीला टोला लगावला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज ठाकरेंनी आमदारांबाबत खोक्याभाई शब्द वापरून केलेल्या टीकेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, असा प्रश्न पत्रकारांकडून अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर “तो कधी निवडून आलाय का?” असं म्हणत अजित पवार यांनी मनसेच्या निवडणुकांतील अपयशावर बोट ठेवलं आहे. अजित पवार यांनी राजकीय अपयशावरून डिवचल्यानंतर आता राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पहावे लागणार आहे.
अख्खं सभागृह खोक्याने भरलं आहे की नाही, त्यांच्या मताशी मी असहमत आहे. पण राज ठाकरे जे बोलत आहेत हे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांनी सध्याच्या राजकारणावर बोट ठेवले आहे. असे खोके भाई असल्यामुळे ते निवडणुकीत सहज जिंकून येतात. सगळे खोके भाई एकत्र झाले आणि राज्यात सरकार बनवलं आहे, असे संजय राऊत म्हणाले.