जळगाव : प्रतिनिधी
एजंटच्या मध्यस्थीने एक लाख ६० हजार रुपये देऊन मुलाचे लग्न केले, मात्र लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधू दागिन्यांसह रात्रीतून पसार झाली. यामध्ये वराकडील मंडळींची दोन लाख ४४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान घडला.
याप्रकरणी १३ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वधूसह एजंट व इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कॉलनी परिसरात २७ वर्षीय रिक्षाचालक तरुण आई, वडील, आजीसह राहतो. त्याच्या आईने बऱ्हाणपूर येथील आशाबाई (पूर्ण नाव समजू शकले नाही) नावाच्या एजंट महिलेशी संपर्क साधला. तिने पूजा गंगाराम गावडे (रा. पिपरी महेपाल, समरडक, ता.जि. यवतमाळ) ही लग्नाची मुलगी असून तिचा फोटो पाठविला. लग्नाची बोलणी पक्की झाली व एजंट महिलेला एक लाख ६० हजार रुपये देण्याचा व्यवहार ठरला. १९ फेब्रुवारीला पूजाचे रामेश्वर कॉलनीतील तरुणाशी लग्न लावून दिले. त्यानंतर एक लाख ६० हजार रुपये घेऊन वधू वगळता इतर जण निघून गेले. दि. २२ फेब्रुवारी रोजी, पूजा घरातून निघून गेल्याचे तरुणाच्या लक्षात आले. शोध घेऊनही पूजा सापडली नाही.
तरुणाच्या आईने मणी-मंगळसूत्र, कर्णफुले, सोनपोत आदी दागिने लग्नामध्ये वधूला घातले होते. मात्र ८४ हजार रुपयांचे दागिने घेऊन वधू पसार झाली. पत्नी परत येत नसल्याने व पैसे, दागिनेही गेल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एजंट आशाबाई, पूजा गावडे, निर्मलाबाई डोंगरे, शिवशंकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत.