चाळीसगाव : प्रतिनिधी
येथे राहणाऱ्या एका महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून ९ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, पीडित महिला ही राहुल कचरू आल्हाट याची पत्नी असून तो महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहे. पतीसह सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यामुळे पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी राहुल कचरु आल्हाट पती, मायाबाई कचरु आल्हाट सासू, तेजस कचरु आल्हाट दीर (सर्व चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, याप्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी क्रमांक ४ ही अनोळखी महिला आरोपी असून तिचा शोध सुरू आहे. तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी करीत आहेत.