यावल : प्रतिनिधी
तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील १२ तासांपासून वन विभागाची शोध मोहीम सुरू असली तरी बिबट्या अद्याप सापडलेला नाही. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बिबट्या व इतर हिंसक प्राण्यांपासून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांनी केले आहे.
यावल तालुक्यातील साकळीच्या मानकी शिवारात चार दिवसांपूर्वी बिबट्याने एका सात वर्षीय आदिवासी मुलावर हल्ला करून त्याचा बळी घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर तालुक्यात सातोद स्त्यावर नीलेश गडे यांच्या गव्हाच्या शेतात तडसाचा फडशा पाडला. विविध भागांमध्ये बिबट्या दिसल्याने यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे आणि पूर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांना विशेष सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. बिबट्याचा वावर लक्षात घेता जनजागृती मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. हिंसक प्राण्यांपासून बचावासाठी नागरिकांना योग्य ती माहिती देण्यात येत आहे.
विशेषतः जंगल परिसरात शेती करणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी बिबट्याबाबत अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना कुठलाही हिंसक प्राणी दिसल्यास तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच जबाबदार आणि सुज्ञ नागरिकांची भूमिका पार पाडावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांनी केले आहे.