जळगाव : प्रतिनिधी
शहरातील आकाशवाणी चौकात भुसावळकडून खोटेनगरकडे जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला. त्यामुळे दुचाकीवरील महिलेचा तोल जावून ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. या प्रकरणी ट्रक चालकावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंपालाल पाटील व रागिणी चंपालाल पाटील हे दांम्पत्य भुसावळहून जळगाव शहरातील खोटेनगर भागातील एका रुग्णालयात उपचारासाठी येत होते. त्यात आकाशवाणी चौकात सायंकाळी ५.३० वाजता सिग्नल सुटल्यानंतर मजूर फेडरेशनच्या बाजूला चंपालाल पाटील यांच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला.
महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच असून, जानेवारी महिन्यात ७जणांचा बळी गेला होता. तर फेब्रुवारी महिन्यातही ४ जणांचा बळी गेला होता. बुधवारी रात्री शिवकॉलनी स्टॉपजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा अपघात होऊन, महिला गंभीर जखमी झाली आहे. २४ तासाच्या आत महामार्गावर दुसरा अपघात झाला आहे. ट्रक चालकाला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा ट्रक देखील पोलिसांनी जमा केला आहे. दुचाकीवरील रागिणी पाटील या रस्त्यावर कोसळल्या, मात्र त्याचवेळी त्यांचा हात व पाय ट्रकच्या मागील चाकाखाली दाबला गेला. यामुळे त्यांच्या हाताला व पायाचा अक्षरश चेंदामेंदा झाला. वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून रागिणी पाटील यांना जीएमसीत दाखल केले.