जळगाव : प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये लोहारा येथून येत असलेल्या रिक्षाला कुसुंबाजवळ खाजगी बसने दिलेल्या धडकेत रिक्षातील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ७वाजता घडली. यात दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रत्नाबाई गणेश हिवाये (४०, रा. लोहारा, पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे. रत्नाबाई या लोहारा येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावातून भाजीपाला खरेदी करून, त्या लोहारा येथे घेऊन जायच्या. मंगळवारी त्या गावातील रिक्षातून जळगाव बाजार समितीकडे येत होत्या. कुसुंबा गावाच्या पुढे एका ट्रॅव्हल्सने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षा उलटून महिला ठार झाली.
लोहारा येथील रिक्षाला धडक बसल्यानंतर अपघाताच्या वेळेस लोहारा येथील युवक मोटारसायकलने जळगावला येत होते. गावातीलच रिक्षाचा अपघात झाल्यामुळे त्यांनी लागलीच गावात ही माहिती कळविली, तसेच जखमींना त्वरित उपचारासाठी जळगावला पाठविले. या अपघातात मयत असलेल्या रत्नाबाई हिवाये यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.
अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक ट्रॅव्हल्स घेऊन पुढे निघून गेला. एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चालकाला सिंधी कॉलनीतून ट्रॅव्हल्ससह ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणी रिक्षा चालक बापू चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच रस्त्यावर सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कुसुंबा येथील पुजाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरात अवघ्या १२ तासांत दुसरा अपघात झाला. धडकेनंतर रिक्षातून रत्नाबाई या थेट रस्त्याच्या कडेला दिशादर्शक फलकावर जाऊन आदळल्या. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचालक बापू भास्कर चौधरी (३०, रा.लोहारा) व गणेश बाबूलाल जाधव (२८, रा. रोटवद तांडा) हे जखमी झाले. दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.