जळगाव : प्रतिनिधी
दुचाकी अपघातात मृत्यू रोखण्यासाठी सोमवार, ३ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांना ही सक्ती असून, चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे बंधनकारक राहणार आहे. हेल्मेट नसल्यास जागेवरच एक हजार रुपये दंड होणार आहे.
१ जानेवारी २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्याविषयी आदेश काढण्यात आले. यामध्ये दुचाकीस्वारांना सवय लागणार यासाठी महिनाभर कडक कारवाईची भूमिका पोलिसांनी घेतली नव्हती, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली. शहरात हेल्मेट सक्ती नसली तरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर महामार्गावरील तसेच चौकांमध्ये हेल्मेट सक्ती राहणार आहे.