मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शरद पवार गटाचे नेते आ.रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. राज्य सरकारमधील गोंधळामुळे राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी तूर खरेदी केंद्र अद्याप सुरु होऊ शकते नाही, असा आरोप आ.पवारांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक हजार कोटींचा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावला गेला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे बहुमताच्या हवेत उडणाऱ्या राज्य सरकारने थोडे जमिनीवर येऊन गंभीरता दाखवत तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी देखील आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्ट माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने या संदर्भातला निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा राज्यातील शेतकरी सरकारला भरडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. राज्य सरकारच्या चुकांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी भरडला गेला असल्याची टीका देखील आमदार रोहित पवार यांनी केली आहे
या संदर्भात आमदार रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, एकीकडे केंद्राने तुरीच्या मुक्त आयातीला मुदतवाढ दिल्याने तुरीचे दर हमीभावापेक्षा खाली कोसळले आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारच्या गोंधळामुळे बहुतांश ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुद्धा सुरु होऊ शकलेली नाहीत, परिणामी राज्यातल्या शेतकऱ्यांना तब्बल 1000 कोटीचा फटका बसला असून पुन्हा एकदा ऐन मोक्यावर शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिसकावला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी जसा भरडला गेला तशीच स्थिती तुरीच्या बाबतीत सुद्धा होताना दिसत आहे. त्यामुळे बहुमताच्या हवेत उडणाऱ्या राज्य सरकारने थोडं जमिनीवर येऊन किमान आता तरी थोडे गांभीर्य दाखवत तूर खरेदी सुरळीत करावी. अन्यथा या सरकारला शेतकरी भरडल्याशिवाय राहणार नाही.