जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील तांडा येथे रहाणारे कै.बाळु भंगु पवार व कै.कबीर भिवा चव्हाण या शेतकऱ्यांचे अपघाती मृत्यू झाले होते. या मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या द्वार दर्शनासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे सुपुत्र माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील हे आले असता गावातील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मृत शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती विषयी कैफियत मांडली.
यावेळी प्रतापराव पाटील यांनी जर अपघाती मृत्यू झाला आहे तर यांचे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. या गोष्टीची जबाबदारी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्विकारुन मयत शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून दोन्ही मयत शेतकऱ्यांचे पत्नी श्रीमती लाचा बाळु पवार व श्रीमती सखुबाई कबीर चव्हाण यांच्या नावाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी प्रस्ताव जळगाव तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले .
दिनांक २२जानेवारी २०२५ रोजी दोन्ही मयत शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाच्या लाभाचा धनादेश लाभार्थ्यांना कृषी पर्यवेक्षक श्रीमती शेवाळे मॅडम कृषी सहायक सचिन बाविस्कर, सपकाळे मॅडम यांच्या हस्ते देण्यात आला या वेळी शिवसेनेचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित होते.