चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बोढरे येथील एका व्यक्तीने चारचाकी गाडीसंदर्भात फसवणूक झाल्याची फिर्याद चार वर्षांपूर्वी दिली होती. याप्रकरणी चारचाकी गाडीसह दोन संशयित पसार झाले होते. या प्रकरणात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी चारचाकी हस्त केली असून यापूर्वीच एकास पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बोढरे येथील गुलाब बाबू राठोड यांनी २८ जुलै २०२१ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्यांच्या मालकीची ६ लाख १५ हजार रुपये किमतीची महिंद्रा एक्सयूव्ही- ५०० ही चारचाकी (एमएच- १७, एझेड ९१७१) बाबत फसवणूक झाल्याचे म्हटले होते. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करत होते. या गुन्ह्याच्या तपासात एक संशयित आरोपी नितीन वाघ यांस अटक करण्यात आली होती. परंतु, नाशिक येथील मुख्य संशयित आरोपी फरहान युनूस तांबोळी हा गाडीसह फरार होता. या आरोपीचा व वाहनाचा आजपर्यंत ८ ते १० वेळा नाशिक, शिरपूर, औरंगाबाद, गडहिंगलाज (जि. कोल्हापूर), बेळगाव (कर्नाटक) येथे शोध घेतला. परंतु, आरोपी व गाडी मिळाली नव्हती.
या गुन्ह्याच्या तपासात पो.हे.कॉ. युवराज नाईक व पो.हे.कॉ शांताराम पवार यांनी गुप्त माहिती मिळाली. त्याच्या आधारे या वाहनाची माहिती काढून २० जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगलाज येथून ही गाडी ताब्यात घेऊन परत आणली आहे. तब्बल ४ वर्षानंतर गुन्ह्यातील फसवणूक झालेली चारचाकी गाडी कसोशीने प्रयत्न करुन पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल, पो.नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉ. युवराज नाईक, पो. हे.कॉ. ओंकार सुतार, पो.हे.कॉ. नितीन सोनवणे, पो.हे.कॉ. शांताराम पवार यांनी केली आहे.