जळगाव : प्रतिनिधी
घरी आलेल्या पाहुण्यांना पत्नी रिक्षा थांब्यापर्यंत सोडण्यासाठी गेलेली असताना प्रेमचंद भगवान पवार (४०, रा. साईनगर) यांनी घरामोरील छताला गळफास घेत आत्महत्या केली. पत्नी घरी आल्यानंतर त्यांना पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. ही घटना सोमवारी (२० जानेवारी) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील एका चटई कंपनीत कामाला असलेले प्रेमचंद पवार हे साईनगरात राहतात. त्यांच्या दोन मुली आणि मुलगा कामानिमित्त घराबाहेर गेले होते तर त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना रिक्षा थांब्यापर्यंत सोडण्यासाठी पत्नी गेल्या होत्या. त्यावेळी प्रेमचंद यांनी घराबाहेर छताला गळफास घेतला. परिसरातील नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.