मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अनेक प्रकरणाच्या माध्यमातून विरोधक टीका करीत आहे तर आज दैनिक सामानाच्या माध्यमातून ठाकरे गटाने महायुतीतील मंत्र्यांवर व सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात अनेक मंत्र्यांनी शपथ घेऊन कार्यभार स्वीकारलेला नाही. ज्यांनी तो स्वीकारला ते त्यांच्या कमिशनबाजीच्या खेळात गुंतले आहेत. ज्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यातील कुणी रुसले आहे तर कुणी रुसून कोपर्यात बसले आहेत. अनेकांना चांगली खाती मिळाली नाहीत म्हणून त्यांचे जगणे बेचव बनल्याचे सामनातून प्रकाशीत झाले आहे.
फडणवीस, नवे वर्षे उजाडले. ही जळमटे दूर करा ! अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने करीत नऊ मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याचे म्हटले आहे. एक महिना उलटून गेल्यावरही राज्याच्या साधारण 9 मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारलेला नाही. म्हणजेच मंत्र्यांनी कामाला सुरुवात केलेली नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्र आता गतिमान होईल, अशा नारेबाजीतून हे सरकार सत्तेवर आले, पण वेगाच्या आणि कामाच्या बाबतीत सगळीच बोंब दिसतेय. मंत्री त्यांच्या कार्यालयात फिरकत नाहीत. कारण मंत्र्यांना त्यांच्या मनाप्रमाणे खाती मिळालेली नाहीत. आता मनाप्रमाणे म्हणजे काय? भ्रष्टाचार, लुटमार करण्यास मुक्त रान आहे, अशी मलईदार श्रीमंत खाती न मिळाल्याने अनेक मंत्र्यांची घुसमट झाल्याचे वातावरण मंत्रालयात पसरले आहे.
विद्यमान राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला शाप आहे. त्यामुळे जनता हवालदिल झाली असून मुख्यमंत्री स्वतःच मनाने अस्थिर बनल्याचे दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार होते. त्या सरकारची चेष्टा तीन चाकी रिक्षा वगैरे शब्दांत तेव्हा केली जात असे, पण ही तीन चाकी रिक्षा आता फडणवीसांच्या नशिबी आली आहे! महाविकास आघाडीची रिक्षा निदान पळत तरी होती, पण फडणवीस, शिंदे, अजित पवारांची रिक्षा जागेवरच रुतून आणि रुसून बसली आहे. महाराष्ट्राचे निम्म्याहून अर्धे मंत्रिमंडळ रुसून-फुगून बसले आहे व त्यांच्यावर सरकारचे प्रमुख म्हणून डोळे वटारण्याची हिंमत अद्यापि मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली नाही.