पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच पुणे येथील राजगुरू नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बारमध्ये काम करणाऱ्या वेटरने नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिच्यासह आठ वर्षीय बहिणीला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकी सुनील मकवाने आणि दूर्वा सुनील मकवाने (दोघी रा. राजगुरूनगर), अशी मृत मुलींची नावे आहेत. अजय दास (वय ५४, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे. मुकवाने दाम्पत्य मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कार्तिकी व दूर्वा या दोन्ही बहिणी बुधवारी दुपारी घराजवळच खेळत होत्या. अचानक त्या गायब झाल्या. सायंकाळी खेड पोलिसांत मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेड पोलिस आणि पुणे क्राइम ब्रँचने संयुक्तपणे तपास सुरू केला. मकवाने दाम्पत्य राहत असलेल्या चाळीलगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये या दोन्ही बहिणी मृतावस्थेत सापडल्या.
नराधमाला फाशी द्या, त्याचा एन्काउंटर करा, अशी मागणी मृत मुलीच्या आई, वडिलांसह नातेवाइकांनी केली. यासाठी खेड पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला, दोन्ही बहिणी खेळत असताना अजय दास याने खाऊचे आमिष दाखवून कार्तिकीला वरच्या मजल्यावरील खोलीत नेले. पाठोपाठ दूर्वादेखील आली. कार्तिकीवर अत्याचाराचा दासने प्रयत्न सुरू केला असता ती ओरडू लागली. दूर्वाही ओरडू लागली. त्यानंतर दास याने दूर्याला बॅरलमध्ये पाण्यात बुडवून मारले. त्यानंतर कार्तिकीवर अतिप्रसंग केला. तिने माझी बहीण कुठे आहे. मी माझ्या मम्मीला नाव सांगणार, असे म्हणताच दास याने आपले बिंग फुटणार म्हणून कार्तिकीही बॅरलमध्ये बुडवून मारले व तो तेथून पळून गेला.