मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत असतांना नुकतेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येच्या प्रकरणावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सद्यस्थितीत राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेत. जाग येण्यासाठी हे सरकार आणखी किती वाट पाहणार? असा संतप्त सवाल यांनी या प्रकरणी सरकारला केला आहे.
कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. त्यातच पुण्यातील राजगुरूनगर येथेही दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटना घडल्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा सु्व्यवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, बदलापूर… आता कल्याण, पुणे ! जाग येण्यासाठी महायुती सरकार आणखी किती घटनांची वाट बघणार? कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी विशाल गवळी याच्यावर यापूर्वीही अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना तो जामिनावर सुटला आणि पुन्हा एका बालिकेवर अत्याचार करून तिचा जीव घेतला. हे अत्यंत संतापजनक आहे. यामुळे राज्यातील पोलिस आणि कायदा यांचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते.
बदलापूर असो किंवा कल्याण, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महायुती सरकार किती गंभीर आहे, हे या घटनांमधून स्पष्ट होत आहे. राजगुरुनगर, पुणे येथे दोन निष्पाप बहिणींची हत्या हा देखील संतापजनक प्रकार आहे. खेळता – खेळता हरवलेल्या या मुलींच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गुन्हेगार निर्भयपणे वावरत आहेत, हे या सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे.