धुळे : प्रतिनिधी
तालुक्यातील विश्वनाथ गावातील यात्रोत्सवात बैलगाडीचा रथ ओढताना अचानक रथ उलटून खाली कोसळला. रथाच्या चाकात गावातील २१ वर्षीय तरुण मयूर नरेंद्र पाटील आल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी सोनगीर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ गावातील यात्रोत्सवात पांरपरिक प्रथेनुसार बैलगाडीद्वारे तगतराव ओढण्याची परंपरा आहे. यात्रोत्सवात तगतरावाचे दुशेर तुटल्याने बैले बिथरले गेले होते, तर तगतराव शाळेच्या भिंतीवर पडल्याने काही मुले जखमी झाले होते. यामध्ये मयूर नरेंद्र पाटील (वय २१, रा. विश्वनाथ, ता.जि. धुळे) हा तरुणदेखील गंभीर अवस्थेत जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्यास येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. प्रकाश सुकळे यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. याप्रकरणी २६ रोजी मंगळवारी सोनगीर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली तपास पो.हे.कॉ. वसावे करीत आहेत.