मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु असतांना या निवडणूका नेमक्या कधी होणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात असतानाच, दोन महिन्यांनंतर; नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यामुळे आता त्या दृष्टीने राजकारणाची चक्रे फिरायला सुरुवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर यांच्यासोबतच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होतील, असे वाटत होते. मात्र या राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना, सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या निवडणुका उशिराने होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
साहजिकच आता राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार याविषयी उलटसुलट तर्क लढवले जात आहेत. या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचा जावई शोधही काहींनी लावला आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी चांदिवली येथील कार्यक्रमात बोलताना, दोन महिन्यांनंतर; नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य केले.
निवडणुकीचा उल्लेख करताना चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. काही दिवसांपूर्वीच महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनीही मुंबई उच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीमध्ये राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यातच पार पडणार असल्याचे म्हटले होते.