मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील राजकारण तापले असतांना नुकतेच मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. केंद्रात भाजपचे सरकार तर राज्यात महायुतीचे सरकार असतांना देखील भाजपच्या एका नेत्याने जरांगे पाटलांकडे उमेदवारी मागितली असल्याने सध्या भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. भाजपमध्ये संधी मिळत नसल्याने होणाऱ्या घुसमटीतून आपण जरांगेंकडे तिकीट मागितले आहे, असे या नेत्याने म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी अवघा महाराष्ट्र पेटवला आहे. या मुद्यावरून त्यांनी सरकार व विरोधी पक्षांची कोंडी केली असताना भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी यांनी मनोज जरांगे यांच्याकडे विधानसभेची उमेदवारी मागून एकच खळबळ उडवली आहे. त्यांनी जरांगे यांच्याकडे विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत बीड शहरातून उमेदवारी मागितली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे रमेश पोकळे यांनी भाजपकडून पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता ते बीड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
रमेश पोकळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, भाजपमध्ये सध्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू आहे. अनेक वर्षे काम करूनही सध्या तिथे संधी मिळत नाही. भाजपमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मोठी खदखद सुरू आहे. लोकांसाठी काम करणाऱ्यांनाी सन्मान मिळत नाही. पण इतर पक्षांतून येणाऱ्यांना पदे दिली जातात. मागच्या 5 वर्षांत ही पदे देण्याचे काम झाले. याऊलट पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना डावलण्यात आले.
रमेश पोकळे पुढे बोलताना म्हणाले की, मी 2019 पासून मराठा चळवळीत सक्रीय आहे. मनोज जरांगे पाटलांनी छेडलेल्या आंदोलनातही मी सक्रीय होतो. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे काही प्रश्न सोडवले. पण मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाच्या मुद्यावर सध्या सरकारी पातळीवर चालढकल केली जात आहे. मी ते उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला विशेषतः भाजपचे बडे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या मुद्यावरून हे दोघेही एकमेकांवर संधी मिळेल तेव्हा निशाणा साधतात. या पार्श्वभूमीवर भाजपच्याच एका नेत्याने मनोज जरांगे यांच्याकडे विधानसभेचे तिकीट मागणे भाजपसाठी मोठी नामुष्कीची गोष्ट असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला माझ्याकडून विरोध होत असल्याचे सिद्ध झाले तर मी तत्काळ माझ्या पदाचा राजीनामा देईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.