मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येवून ठेपले असतांना नुकतेच उद्धव ठाकरे काँग्रेसचे उपरणे घालून थेट काँग्रेसच्या सद्भावना मेळाव्यात सहभागी झाले होते. १५ ते २० मिनिटे त्यांनी उपरणे घातले होते. शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्याने काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे उपरणे घातल्याचा प्रकार शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असल्याने अनेक छायाचित्रकार तो टिपत होते. त्याचा उल्लेख करत उद्धव यांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले. काँग्रेस पक्षाचा मान राखावा, सन्मान द्यावा या भावनेपोटी उपरणे घातल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे भले करण्यासाठी नव्हे तर भारताला लुटण्यासाठीच सत्तेवर आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात काँग्रेसतर्फे मंगळवारी सद््भावना दिन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विशेष अतिथी म्हणून उद्धव ठाकरे, शरद पवारांना निमंत्रित करण्यात आले होते. राहुल गांधीही या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनी ऐनवेळी दौरा रद्द केला. तरीही उद्धव व पवारांनी आवर्जून उपस्थिती लावली. सर्व नेते मंचावर स्थानापन्न होत असताना काँग्रेसचे प्रदेश महासचिव नाना गावंडे यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे चिन्ह म्हणून उपरणे दिले. ते उद्धव यांनी गळ्यात घातले. शरद पवार थोडे उशिराने मेळाव्यात दाखल झाले. त्यांनाही गावंडे यांनी उपरणे दिले. तेव्हा त्यांनी बराच वेळ ते हातातच ठेवून नंतर घातले. त्यानंतर उद्धव यांनी गळ्यातून उपरणे काढले. भाषणात त्यांनी मोदी, भाजपवर कडाडून टीका करत काँग्रेसचे उपरणे गळ्यात घालण्याचे समर्थन केले. उद्धव यांनी १५-२० मिनिटानंतर उपरणे काढून ठेवले. मात्र, उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मेळावा संपेपर्यंत काँग्रेसचे उपरणे कायम ठेवले होते.
दरम्यान, खरगे म्हणाले की, काँग्रेसने गेल्या ७० वर्षात देशात विकासाची क्रांती आणली. त्या विकासाला आपले म्हणण्याचे काम मोदी करत आहेत. नेहरू, इंदिरा, राजीव गांधींनी तरुणांसाठी काय केले हे आजच्या युवकांना माहिती नाही.मोदी महागाईवर बोलत नाहीत. मात्र, काँग्रेसचा ७० वर्षांचा इतिहास विचारतात. आता मोदींना आम्ही त्यांच्या काळात काय विकास केला असा प्रश्न विचारणार. अब की बार ४०० पार म्हणणाऱ्या मोदींना महाराष्ट्राने तडीपार केले. टीडीपी आणि जेडीयूने साथ सोडली तर मोदी चालू शकणार नाहीत. राजीव गांधींनी देशात ४१५ जागा जिंकून आणल्या होत्या. देशात महत्त्वाचे ११ प्रकल्प आणले, मात्र त्याचा प्रपोगंडा केला नाही, असाही दावा खरगे यांनी केला.