जळगाव : प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी राज्यातील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाची उघडीप असणार आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही पावसाची शक्यता आहे. दरम्यान, उद्यापासून तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप असणार आहे.
राज्यातील काही ठिकाणी पुढील तीन-चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे व रायगडसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील पालघर, रायगड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे. पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम असणार आहे. रविवारी धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तळकोकणातील काही भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडीत पावसाचाजोर कायम आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.