जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना, शेतकऱ्याच्या खिशातून ३५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शालीग्राम तुकाराम पाटील (वय ६५, रा. सामरोद, ता. जामनेर) हे बुधवारी जळगाव शहरात कामानिमित्त आले होते. दुपारी काम संपल्यानंतर, २.३० वाजता जळगाव बसस्थानकात आले. त्याठिकाणाहून दुपारी ३ वाजता जामनेर बसमध्ये चढत असताना, त्यांच्या खिशातून ३५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवून नेली. बसमध्ये बसल्यानंतर खिशातील रक्कम चोरून नेल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी बसमधून उतरून थेट जिल्हा पेठ पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी शालीग्राम पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.