मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात मोठी आघाडी घेतली असून त्यांनी विधानसभेच्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली आहे. आपण राज्यातील जवळपास 250 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार मनसेच्या वतीने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना मनसेच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पंढरपूर विधानसभेमध्ये समाधान आवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात मनसेने दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर अजय चौधरी शिवडी विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकंदरीत एक उमेदवार हा उद्धव ठाकरे गटाविरोधात तर एक उमेदवार हा भाजप विरोधात दिल्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे हा तगडा प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरे यांनी उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मनसेचे काम, राज ठाकरे यांच्या कामावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे पंढरपूर मधून निश्चितपणे मनसेचा उमेदवार विजयी होईल असा दावा दिलीप धोत्रे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. उमेदवार मी असो किंवा कोणीही असो, पंढरपूरमधून राज ठाकरे यांचा उमेदवार विजयी होईल, असा दावा दिलीप धोत्रे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. मागील दहा वर्षापासून मी या मतदारसंघात काम करत आहे. तसेच या मतदारसंघातील सर्व प्रश्न आजपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करत आलो आहे. आणि यापुढे देखील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचा दावा दिलीप धोत्रे यांनी केला आहे. पांडुरंगाचा प्रसाद म्हणून यावेळी मनसेचा आमदार विधानसभेत निवडून जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिलीप धोत्रेचे काम सर्वांना माहिती आहे. पॅरलर सरकार म्हणून आजपर्यंत काम केले आहे. त्यामुळे आमच्यासमोर कोणाचेच आव्हान नसल्याचा दावा देखील धोत्रे यांनी केला आहे.
शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी हे उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बाळ नांदगावकर असा सामना आता रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. मनसेच्या स्थापनेपासून ते राज ठाकरे यांचे एकनिष्ठ मानले जात आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.