मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा वाद सुरु असतांना आता शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद करण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलवावे आणि याप्रकरणी तोडगा काढला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी विरोधकांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले होते. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलतांना शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, ”आरक्षणप्रकरणी मला एक चिंता वाटत आहे. ती म्हणजे दोन समाजात दरी निर्माण होते की काय असे चित्र आहे. विशेषतः मराठवाड्याच्या दोन ते तीन जिल्ह्यांत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आमच्यासारख्या नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. याप्रकरणी चर्चा आणि संवाद होणे महत्वाचे असल्याने सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलावले पाहिजे”, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, ”मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. या प्रश्नात मार्ग निघायला पाहिजे असं मला वाटतं. सरकारने जो संवाद साधला पाहिजे होता, तो झाला नाही असं मला वाटतं, असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. जरांगे आणि त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि इतर लोक संवाद ठेवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण दुसरे जे घटक आहेत, जे जरांगेंना विरोध करत आहेत, त्यांच्याशी सरकारमधील दुसरे लोक सुसंवाद ठेवत आहेत हे कशासाठी? त्यांनी दोन्ही समाजाला विश्वासात घेऊन चर्चा करावी”.
”आरक्षणाच्या मुद्यावरून दुर्दैवाने आज राज्यात दोन वेगळे गट पडले आहेत. त्या गटांना कुणीतरी काहीतरी सांगितले आहे. आजच्या राज्यकर्त्यांनीही दोन वेगळ्या बाजू घेतल्या आहेत. राज्याकर्त्यांच्या एका वर्गाने ओबीसींची बाजू घेतली आहे, तर दुसऱ्या वर्गाने मराठा आंदोलकाची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही, आपण सामंजस्य कसं निर्माण करू शकू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी संवाद आवश्यक आहे”, असे शरद पवार म्हणाले.