जळगाव : प्रतिनिधी
तुमच्याविरुद्ध ईडी ऑफिसमध्ये तक्रार झाल्याचे सांगत भुसावळ येथील एका अभियंत्याची अज्ञात सायबर भामट्यांनी १५ लाखांत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुम्हाला केव्हाही अटक होईल, अशी भीती घालून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत गुरुवार, दि.२७ जून रोजी दुपारी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील ५० वर्षीय अभियंत्यास बुधवारी, दि.२६ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून तुमचा फोन दोन तासात बंद होईल असे सांगण्यात आले. फिर्यादीने कारण विचारले असता, तुम्ही मोबाईल क्रमांकावरून गैरप्रकार केला असून त्याबाबत मुंबई येथे तक्रारी दाखल झाली आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास त्यांना दुसरा कॉल आला. त्या व्यक्तीने टिळक नगर पोलिस स्टेशनमधील पोलिस इन्स्पेक्टर विनायक बाबर बोलत असल्याचे सांगितले. तुमच्याविरुद्ध टिळक नगर पोलिस स्टेशन मुंबई येथे तक्रार दाखल झाली असून विविध कागदपत्रे मागविण्यात आली. फिर्यादीने कागदपत्रे पाठवल्यानंतर त्यांना सायबर भामट्यांनी ईडी ऑफिसचे बनावट पत्र पाठविले. तुमच्या नावाने अटक वॉरंट तयार असून ते थांबवायचे असल्यास १५ लाख रुपये रक्कम द्यावी लागेल असा दम भरला.
त्यानंतर बाबर नामक व्यक्तीने त्याचे बंधन बँकेचे खाते क्रमांक पाठविले. फिर्यादीने भीतीपोटी त्याच्या बँकेच्या खात्यातून १५ लाख रुपये आरटीजीएसमार्फत भरले. फिर्यादीने हा प्रकार त्याच्या परिवारातील सदस्य तसेच मित्रांना सांगितला. त्यांनी तुमची कोणीतरी फसवणूक करत असल्याचे सांगून सायबर पोलिसात तक्रार नोंदविण्यास सांगितले. यानंतर दि. २७ जून रोजी सायबर पोलिस स्टेशनला अभियंत्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तपास करीत आहे