पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटना सत्याने घडत आहे. अशीच एक खळबळजनक घटना पुणे शहरातील एका लॉजवर घडली आहे. पत्नीला लॉजवर नेत पतीने तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली. पुण्यातील भारती विद्यापीठ भागातील लॉजवर ही घटना घडली असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. काजल कृष्णा कदम असं या घटनेत मृत्यू झालेल्या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. महिलेचा आरोपी पती कृष्णा कदम याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये घटस्फोटाचं प्रकरण सुरू होतं. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचं ठरवलं होतं. यानंतर पतीने पत्नीला लॉजवर भेटून चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. शनिवारी दुपारी दोघंही भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लॉजवर गेले. तिथे त्यांनी मद्यपान केलं. नशेत त्यांचा पुन्हा वाद झाला आणि या वादातून कृष्णाने चाकूने भोसकून पत्नीची हत्या केली. यानंतर तो खोलीला बाहेरून लॉक लावून पसार झाला.
यानंतर मित्रांसोबत मद्यपान करताना त्याने ही गोष्टी मित्रांना सांगितली. याबद्दल ऐकताच मित्र घाबरले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लॉजवर जात मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पत्नी काजलचा लॉजवर नेऊन खून केल्याचं समोर आलं.