धरणगाव (प्रतिनिधी) सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ व जळगाव ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत नेमका कोणाचा विजय होईल, याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल व विधानसभेत उमेदवार कोण असतील?, ही निवडणूक कशी झाली?, निकालात कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम दिसून येईल,, आदी विषयांवरील चर्चा सुरु आहेत.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ म्हटले की, सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव. यावेळेसही पालकमंत्री जळगाव ग्रामीणमधून आपले नशीब आजमावतील हे स्पष्ट आहे. परंतू महाविकास आघाडीतून त्यांच्यासमोर कोण उभे राहणार? आणि तो उमेदवार गुलाबभाऊंसमोर टिकाव धरू शकेल की नाही?, याची देखील चर्चा आतापासून सुरु झाली आहे. गुलाबराव पाटील यांचे संघटन आणि विविध विकासकामे यामुळे उमेदवार देतांना महाविकास आघाडीची मोठी दमछाक होणार आहे. तसेच आघाडीतील घटक पक्ष आणि त्यांचे इच्छुक उमेदवार नाराज होणार नाही, याची काळजी देखील तिकीट मिळणाऱ्या उमेदवाराला घ्यावी लागणार आहे.
नामदार गुलाबराव पाटील यांना बरोबरीची टक्कर देण्यासाठी तसाच उमेदवार महाविकास आघाडीला शोधावा लागणार आहे. जळगाव ग्रामीणसाठी प्रामुख्याने माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव आघाडीवर आहे. दोन्ही गुलाबरावांमध्ये सामना झाल्यास तोही रंगतदार होणार आहे. परंतू शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा संघर्ष बघता त्यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एक नव्हे तर दोन वेळेस उद्धव ठाकरे यांनी वाघ यांना उमेदवारी मिळू शकते, अशा आशयाचे संकेत दिले होते. तसेच गुलाबराव वाघ यांच्या धर्मपत्नी धरणगावच्या माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
दुसरीकडे धरणगावचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक सुरेशनाना चौधरी किंवा त्यांचे सुपुत्र धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी अडचणीच्या काळात धरणगावच नव्हे तर जिल्ह्यात पक्षाला मोठा आधार दिला. तसेच त्यांचे मतदार संघातील व्यावसायिक जाळे बघता दोघां पिता-पुत्र पैकी एक जण कुणीतरी देखील उमेदवार होऊ शकतो. एवढेच नव्हे तर, लक्ष्मण पाटील (लकी टेलर) हे देखील विधानसभा लढविण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गुलाबराव देवकर सोडले तर उर्वरित सर्व दावेदार हे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. परंतू आता उमेदवारी नेमकी कुणाला मिळते? आणि लढत किती रंगतदार होते?, हे जळगाव ग्रामीण मधील मतदार ठरवतील.
दरम्यान, जळगाव ग्रामीणची जागा महाविकास आघाडीच्या दृष्टीने विचार केला तर ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाते अशी चर्चा आहे. लोकसभेला गुलाबराव देवकरांसह राष्ट्रवादीने पूर्ण ताकदीने काम केले आहे. जर जागा राष्ट्रवादी सोडली तर ठाकरे गटाचे पदाधिकारी जे शिंदे गटासोबत संघर्ष करताय?, त्यांचे काय होणार? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आगामी काळातच मिळू शकतील.