नाशिक : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष ठाकरे गटाने जोरदार प्रचार करीत असतांना आता याच ठाकरे गटाला नाशिक मतदार संघात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बडा नेता आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत महायुतीमधील पेच सुटत नव्हता. एकीकडे अखेर महायुतीचा उमेदवार जाहीर झाला. त्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असल्याचं चित्र आहे.
ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विजय करंजकर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी डावलून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानं करंजकर यांनी बंडाचा झेंडा उचलला आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली असल्याचं चित्र आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात अगोदर महायुतीचा उमेदवार ठरवण्यावरुन संघर्ष सुरू होता. त्यानंतर आता यामध्ये आणखीन भर पडली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात निवडणूका होणार आहेत. पाच मे रोजी नाशिकमध्ये मतदान पार पडणार आहे. आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. अशातच ठाकरे गटाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे. अशातच एक नवीन ट्विस्ट पुन्हा समोर आला आहे. आता नाशिकमध्य पाच उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचं दिसत आहे. ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यामुळे करंजकर नाराज असल्याचं समोर येत आहे. आता विजय करंजकर नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं दिसतंय. ६ मे पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेता येणार आहे.