चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या १५ वर्षीय मुलाचा झटके आल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ऐन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमन मनोहर निकम (१५, रा.चिंचखेडा, ता. चाळीसगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अमन हा पोहण्यासाठी आला. त्याने पाण्यात उडी घेतली. मात्र काही वेळात पाण्यातच त्याला झटके येत असल्याचे गार्ड मधुकर चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी आवाज देत इतर गार्डच्या मदतीने अमनला बाहेर काढले आणि खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी तलावाचे व्यवस्थापक महेंद्र प्रल्हाद चौधरी यांनी फिर्याद दिली. त्यावरून चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.