चाळीसगाव : प्रतिनिधी
ऊस तोडणी कामगारांच्या ५ झोपड्यांना शनिवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागल्याची घटना तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे घडली आहे. या आगीत संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य, पैसे आदी सर्वच वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे हे कामगार रस्त्यावर आले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी कामगार काही महिन्यांपासून ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले होते. हे कामगार शुक्रवारी घरी परतले. शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या झोपड्यांना आग लागली. कुटुंबातील सर्वजण दुपारी जेवण करून बाहेर झोपले होते. आगीत झोपड्या जळून खाक झाल्याचे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांना अश्रू आवरणे अवघड झाले होते. आग इतकी भीषण होती की काही वेळेतच सर्व काही खाक झाले. बाहेरगावाहून प्रत्येक कामगारांकडे २० ते ४० हजार रुपये आणले होते. तेही यात जळून खाक झाले.
या नुकसानीमध्ये भगवान भिल, चंद्रकांत भिल, विमलबाई सोनवणे, प्रकाश भिल व संतोष भिल या कामगारांचा समावेश होता. घटनास्थळी सरपंच दिलीप पटाईत, उपसरपंच नाना पवार, ग्रा. पं. सदस्य वसंत भिल, प्रकाश मोरे उपस्थित होते. सायंकाळी तलाठी धीरज देशमुख यांनी या घटनेचा पंचनामा केला.या कामगारांना उपसरपंच नाना पवार यांनी प्रत्येक कामगारांना एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली