नागपूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमान गावामध्ये पती, पत्नी आणि मुलगा असे तिघांचे मृतदेह घरात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तिघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूरच्या (Nagpur) मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमान गावातील एका घरात कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. पती श्रीनिवास इळपुंगटी (वय 58 वर्षे),पत्नी पद्मलता इळपुंगटी (वय 54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय 29) अशी मृतांची नावे आहेत.
श्रीनिवास इळपुंगटी यांचा राईस मिलचा व्यवसाय असून या तिघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप समोर आले आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तिनही मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.