चाळीसगाव : प्रतिनिधी
आई-वडील अभ्यासावरून रागवले, म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलीने रागाच्या घरात घर सोडले. या रागातच ती मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेने जात असताना चाळीसगाव येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या रूपाने देवदूत मिळाला अन् ही मुलगी भरकटण्यापूर्वीच बचावली.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले व सहकारी पोना. राकेश पाटील हे दि. १२ रोजी मानवी हक्क आयोग कार्यालय, मुंबई या ठिकाणी सेवाग्राम एक्सप्रेसने जात असताना त्यांच्या बाजूला सीटवर बसलेली साधरणतः १५ वर्षे वयाची मुलगी कावऱ्याबावऱ्या नजरेत दिसून आली. घुले यांनी विचारपूस केली असता तिने गोपालपुरा, नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले. ही मुलगी नववी इयत्तेत असून तिचे आई वडील तिला अभ्यासावरून नेहमी सतत बोलत असतात. या बोलण्याला कंटाळून तिने रागाच्या भरात नागपूर येथून मुंबईला जाण्यासाठी घरातून पळून आली आहे, अशी धक्कादायक माहिती मुलीने दिली. गांभीर्य ओळखून घुले यांनी तिची विचारपूस करत तिला विश्वासात घेतले असता मुलीने वडिलांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. त्या क्रमांकावरून त्यांनी मुलीच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना त्यांची मुलगी आमच्या सोबत सुरक्षित असल्याचे सांगितले. मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याबाबत नागपूर येथील प्रताप पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद केल्याचे सांगितले.मुंबईला पोहोचल्यावर उपनिरीक्षक संदीप घुले यांनी या मुलीला दादर लोहमार्ग पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. तसेच मुलीच्या वडिलांची माहिती व भ्रमणध्वनी क्रमांक दिला. भरकटण्यापासून ती मुलगी बचावली