नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक राज्यात खुनाच्या घटना सातत्याने घडत असताना एक धक्कादायक घटना बिहार राज्यातून समोर आली आहे. शेतातील हरभऱ्याच्या भाजीची पाने तोडल्याच्या रागातून १४ वर्षीय मुलीला काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या बेदम मारहाणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चैनपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हाता गावातील जितेंद्र राम यांची मुलगी सुंदरी कुमारी (१४) तिच्या चुलत भावासोबत बुधवारी (२० डिसेंबर) शेजारच्या गावातील एका शेतात भाजी काढण्यासाठी गेली होती. यावेळी तिला शेतमालक रामधर यादव आणि त्यांचा मुलगा गौरव यादव या दोघांनी हरभऱ्याच्या भाजीची पाने खुडताना पाहिले.
यावेळी बाप लेकांनी मिळून मुलीला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुंदरी कुमारीचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुलीचे वडिल जितेंद्र राम यांनी चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी बोलताना चैनपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ शंभू कुमार यांनी “आम्ही आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या घटनेनंतर कैमूरचे जिल्हा सचिव विजय यादव यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय-एमएलच्या पाच सदस्यीय पथकाने पिडीतेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबियांनी आरोपींना तात्काळ अटक करावी आणि 20 लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली.