जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात काहीही कारण नसताना मला का चिडवता, असा जाब विचारल्याने २० वर्षीय तरुणाला दोन जणांनी मारहाण केल्याची घटना घडली असून यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बहिणीलादेखील शिवीगाळ करीत तिची पोत तोडली. ही घटना ७ डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बोरनार येथील रहिवासी आवेश गुलाम रसूल शेख (२०) या तरुणाला दोन जण चिडवत होते. त्या विषयी तरुणाने जाब विचारला असता दोघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. भांडण विकोपाला गेल्याने तरुणाची बहिण भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिलादेखील शिवीगाळ करीत तिची पोत तोडली. या प्रकरणी तरुणाने औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकों प्रदीप पाटील करीत आहेत.