जळगाव : प्रतिनिधी
राज्यभरात अनेक ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाच काही ठिकाणी गारपिटीनेही तडाखा दिला आहे. रविवारच्या तडाख्यानंतर सोमवारी देखील राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सुधारला असून मुंबईतील प्रदूषण कमी झाले आहे. शिवाय सोमवारी संध्याकाळी मुंबई शहर उपनगरात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच आहे. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह रात्री एक वाजता अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुरीचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत असल्याने पावसामुळे फुलगळ होणार आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर इतर फळं आणि भाजीपाला पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात जोरदार, मुंबईसह कोकणातील सर्व ७ + खान्देशसह मध्य महाराष्ट्रातील १० अशा १७ जिल्ह्यात मध्यम, पावसाची शक्यता जाणवते. विदर्भातील सर्व ११ (विशेषतः अकोला, बुलढाणा, वाशिम) व मराठवाड्यातील ६ जिल्हे (छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड व नांदेड) अशा एकूण १७ जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे.