नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभर दिवाळीची धामधूम सुरु असतांना गुन्हेगारी घटना घडत उघडकीस येत आहे. अशाच एका घटनेने कर्नाटकमध्ये खळबळ माजली आहे. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात आई आणि ३ मुलांसह एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालीय. रविवारी १३ नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. मारेकऱ्याने आधी महिला आणि तिच्या दोन मोठ्या मुलांची हत्या केली. तेवढ्यात महिलेचा 12 वर्षांचा धाकटा मुलगा आत आला.
मारेकऱ्याने त्याला पाहताच त्याच्यावर हल्ला करून निष्पाप बालकाचाही चाकूने वार करून खून केला.
मृताच्या शेजाऱ्याला आवाज आल्याने ते धाऊन गेले मात्र मारेकऱ्याने त्यालाही धमकावले. मारेकऱ्यांनी महिलेच्या सासूवरही चाकू हल्ला केला ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. प्राथमिक तपासात हे हत्याकांड पुर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घरामध्ये कोणतीही चोरी झाली नाही किंवा कोणत्याही वस्तूला मारेकऱ्यांनी हात लावला नाही, त्यामुळे हे हत्याकांड वैयक्तिक कारणामुळे झाल्याची शक्यता उडुपीच्या जिल्हा अधिक्षकांनी वर्तवली आहे.