सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतांना सांगली जिल्ह्यातील हरिपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत काळया जादूचा वापर झाल्याची चर्चा आहे. अज्ञाताकडून काळया बाहुल्यांची पूजा केली गेली तर मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी त्या बाहुल्या जाळून टाकल्या. दरम्यान या घटनेबाबत पाेलीसांत नाेंद झालेली नाही.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयासाठी सध्या टोकाचे प्रयत्न केले जात आहेत. सांगली नजीकच्या हरिपुरात निवडणुकीत चक्क काळया जादूचा वापर केला जात आहे. अज्ञाताकडून हरिपूरमध्ये बाहुल्यांची पूजा मांडण्यात आली.
यानंतर संतप्त मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जादूटोणा केलेल्या बाहुल्या जाळून निषेध केला. हरिपूर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक सुरू आहे. यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. सध्या ग्रामपंचायतीवर तांबवेकर प्रणित बोंद्रे पॅनेलची सत्ता होती. सत्ताधारी गटाची सत्ता उलथवून लावण्यासाठी मोहिते पॅनल रिंगणात आहे. यातून आरोप प्रत्यारोप सुरू आहेतच मात्र रात्री हरिपूर येथे एका ठिकाणी काळया बाहुलीची जादू सर्वांना धक्का देणारी ठरली.
एका घराच्या बाहेर सात बाहुल्या पुजून ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली. निवडणुकीच्या विजयासाठी काहींनी हा प्रकार केल्याचा आरोप मोहिते पॅनलकडून करण्यात आला. काळी जादू करून निवडणुका जिंकू पाहणाऱ्या विरोधकांना चपराक म्हणून मोहिते पॅनलकडून या बाहुल्या जाळून अंधश्रध्देला तिलांजली देण्यात आली अशी माहिती अशोक भाऊ मोहिते,(पॅनल प्रमुख) यांनी दिली. तर अशी काळी जादू करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्तारूढ बोंद्रे पॅनलकडून अरविंद तांबवेकर (बोंद्रे पॅनल प्रमुख) यांनी केला आहे.