मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असतांना नुकतेच वाशीलगतच्या कोपरी गावात राहणाऱ्या एका तरुणाने कामधंदा करण्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या आईची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रूपचाँद रहेमान शेख (वय २१) असे आरोपीचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरी गावातील गावदेवी मंदिराच्या जवळच्या सागर भोईर इमारतीमध्ये महिलेचे नाव सलमा ऊर्फ जहानारा खातून रहेमान शेख (वय ४३) असे असून ती मुलगा रूपचाँद शेख याच्यासोबत राहत होती. कोपरी गावातच दुसऱ्या इमारतीत सलमाची विवाहित मुलगी जास्मीन राहण्यास आहे. सलमा ही घरकाम करून कुटुंब चालवत होती.
मात्र तिचा मुलगा रूपचाँद हा काहीही काम करत नव्हता. त्यामुळे सलमाने त्याच्यापाठी कामावर जाण्याचा तगादा लावला होता. शनिवारी रात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास सलमाने रूपचाँदला कामावर जाण्याबाबत विचारले. या वेळी या माय-लेकामध्ये भांडण सुरू झाले. या वेळी रागाच्या भरात रूपचाँदने सलमाची गमजाच्या साह्याने गळा आवळून हत्या केली. जवळच राहणाऱ्याला जास्मीनला ही घटना समजताच तिने एपीएमसी पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी आरोपी रूपचाँदला पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली.