जळगाव : प्रतिनिधी
एकत्र कुटुंबातून वेगळे निघालेल्या भावजयीच्या घरात घुसून दिराने विनयभंग केला. ही घटना विवाहितेच्या सासरी घडल्यानंतर ती माहेरी आल्यावरदेखील येथे सासरा व जेठाने येऊन मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील माहेर असलेल्या तरुणीचे २००७ मध्ये पंजाबमधील तरुणाशी लग्न झाले. लग्नानंतर सासरची मंडळी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. त्यामुळे विवाहिता वेगळी निघाली. २०२१मध्ये विवाहितेच्या दिराने घरात येऊन विवाहितेचा विनयभंग केला. तसेच वारंवार फोन करून जिवे ठार मारण्याची धमक्या दिल्या जात आहे. या प्रकरणी विवाहितेने जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली. सासरच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि उल्हास चहाटे करीत आहेत.