चंडीगड : वृत्तसंस्था
पंजाबमधील जालंधर येथे चार ते नऊ वर्षे वयोगटातील तीन सख्ख्या बहिणींचे मृतदेह एका ट्रंकमध्ये आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी त्या मुलींची आई व वडील यांना पोलिसांनी अटक केली आहे. या बहिणी रविवारपासून बेपत्ता होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन बहिणींचे मृतदेह असलेली ट्रंक त्यांच्या घराबाहेर ठेवण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना मुलींच्या आईवडिलांवर पोलिसांचा संशय बळावला. तीन मुलींची आपणच हत्या केली, अशी कबुली आईवडिलांनी पोलिसांकडे चौकशीदरम्यान दिली. पोलिसांनी सांगितले की, हालाखीची आर्थिक स्थिती असल्यामुळे तीन मुलींचे पालनपोषण करणे त्यांच्या आईवडिलांना शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी तिघींना विष चारून एका ट्रंकमध्ये ठेवले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. आपण मुलींची हत्या केल्याचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांच्या आईवडिलांनी रचलेला बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. अटक केलेल्या दाम्पत्याला आणखी दोन मुले आहेत. त्यांना दारूचे व्यसन आहे.