नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक राज्यातील गुन्हेगारीच्या घटना घडत असताना एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने 6 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. हत्येचं कारण तर तितकच संतापजनक आहे. पोलिसांना आरोपीला अटक केली आहे.
आरोपीने चिमुकलीला पान मसाला आणण्यासाठी दुकानात पाठवलं होतं. मात्र मुलीने पान मसाला आणण्याऐवजी चिप्स विकत घेतले. याचा आरोपीला राग आल्याने त्याने मुलीची हत्या केली.
मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीच्या दोन भावांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी मंगळवारी सकाळी अलिगड कॉलनीतून बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी तिचा बराच शोध घेतला. मात्र ती सापडला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता आरोपी संशयाच्या भोवऱ्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता मुलीचा मृतदेह तिथे सापडला. आरोपीने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आणि सांगितले की, त्याने मुलीला 20 रुपये दिले आणि तिला पान मसाला आणण्यासाठी पाठवले होते. मात्र मुलीने स्वतःसाठी चिप्सचे पॅकेट विकत घेतले होते. यावरून त्याने रागाच्या भरात हत्या केली. यानंतर मृतदेह गोणीत ठेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार होता. सध्या पोलिसांना आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.