अवघ्या काही महिन्यांवर २०२४ ची विधानसभा निवडणूक आहे. अशात या निवडणुकीची चर्चा, तर्कवितर्क आणि कोण कुठून निवडणूक लढवणार याची जोरदार चर्चा होत आहे. अशातच पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. ही यात्रा देवदर्शनाच्या अनुषंगाने काढली असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. पण या यात्रे दरम्यान अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. परळीतील वैद्यनाथाचं दर्शन घेत या यात्रेचा काल समारोप झाला. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं. त्यांचं हे भाषण म्हणजे आगामी निवडणुकीचं रणशिंग असल्याचं राजकीय वर्तुळात आता बोललं जात आहे.
राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या परळी मतदारसंघाची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत गेला. त्यांच्यासोबत धनंजय मुंडेही भाजपसोबत गेले. तेव्हापासूनच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि परळी मतदारसंघ चर्चेत आला. धनंजय मुंडे युतीत आल्याने या मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार याची चर्चा झाली. पण पंकजा मुंडे यांच्या कालच्या 14 मिनिटांच्या भाषणाने अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे.
गोपीनाथ मुंडेसाहेब मोठे नेते होते. लोक त्यांना म्हणायचे, की तुम्ही राहू… या लहान-सहान गोष्टी आम्ही पाहतो. तुम्ही पुढे जा… तेव्हा ते मोठे झाले. माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मला जाऊ द्या… मला जग जिंकू द्या… मला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मला अडकवून ठेवू नका. याच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला नाही आले. त्याच्या या कार्यक्रमाला नाही आले, असं करत मला अडकवून ठेवू नका. त्यावरून माझं आकलन करू नका. मी छोट्या डब्यात बसत नाही. मला पुढे जाऊ द्या. मला मोठं काम करू द्या. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आणि उपस्थितांना आवाहन केलं.
पंकजा मुंडे यांनी बोलताना आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, मला आशीर्वाद द्या. निवडणुकीत मी कुठे उभं राहणार आहे? पुढे काय होणार आहे? हे माहिती नाही. पण मी प्रीतमला खाली बसवून मोठी होणार नाही. तिला आणखी मोठं होण्यासाठी आशीर्वाद देते, असं पंकजा मुंडे म्हणालेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी या 14 मिनिटांच्या भाषणातून येत्या विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.