नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणत घडत आहे. अशीच एक घटना छत्तीसगडच्या विलासपूरमध्ये घडली आहे. तेथे एका भाजी व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जबलपूर येथील व्यापारी आणि राजस्थानमधील व्यापारी यांच्यात भाजीचा सौदा झाला होता. पण जबलपूरच्या व्यावसायिकाला तो भाजीपाला आवडला नाही. त्यामुळे त्यांच्यातील सौदा फिस्कटला. दोघांवरून त्याच कारणामुळे वाद झाला. त्यानंतर जबलपूरच्या व्यापाऱ्याने राजस्थानच्या व्यापाऱ्याची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, विलासपूरच्या तख्तपूर भागातील जबलपूर येथील भाजी व्यापारी सनम अन्सारी यांना राजस्थानचे भाजी व्यापारी भगवानराम बिश्नोई यांनी आणलेल्या काही भाज्या आवडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील खरेदीचा सौदा फिस्कटला. यामुळे भगवानराम संतापले आणि त्यांनी समोरील व्यापाऱ्याला शिवीगाळ केली तसेच मारहाणही केली. यामुळेच जबलपूरचा व्यापारी संतापला आणि त्यांनी भगवानराम याला संपवण्याची योजना आखली.
जबलपूरचे व्यापारी विलासपूरला पोहोचले आणि त्यांनी भगवानराम यांचे अपहरण केले. त्यानंतर त्याना अज्ञातस्थळी नेऊन खूप मारहाण केली आणि त्यांचा जीवही घेतला. मृतदेहाची विल्हेवाट लावून त्यांनी तेथून पळ काढला. मात्र भगवानराम घरी न आल्याने कुटुंबिय काळजीत होते. अखेर त्यांचा भाऊ श्रावण कुमार याने ३ सप्टेंबर रोजी पोलीस ठाणे गाठून भाऊ, भगवानराम हे हरवल्याची तक्रार दाखल केली. 2 सप्टेंबर रोजी आदित्य कृषी फार्म येथून घरी येण्यासाठी निघाले होते, मात्र अद्याप घरी आले नसल्याचे त्याने नमूद केले.
त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवत तपास सुरू केला असता, कृषी फार्म येथून एक किलोमीटर अंतरावर भगवानराम यांची चप्पल आणि बाईक सापडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच, कावर्धा जिल्ह्यातील कुंडा पोलीस स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती त्यांना मिळाली. भगवान विष्णोई अशी त्यांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत जबलपूरला एक पाठवले. तेथे सनम अन्सारीचा भाऊ गुलशेर अहमद याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी गुलशेर अहमद या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कबुलीनुसार, तो, त्याचा भाऊ सनम अन्सारी, ट्रान्सपोर्टर आणि भाजी व्यापाऱ्यासह बासाझाल येथे गेले. तेथून त्यांनी भगवानराम याचे अपहरण करून जबलपूरला निघाले, मात्र तेथे रस्त्यातच त्यांची हत्या केली. व नंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून फरार झाले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सनम अन्सारीलाही अटक केली असून इतर दोघांचा शोध घेत आहेत.