अहमदनगर : वृत्तसंस्था
भारतामध्ये गेल्या काही वर्षापासून अनेक लोक घुसखोरी करीत असल्याच्या घटना ताज्या असतांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात चार बांगलादेशींनी घुसखोरी केल्याने नगरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. अन्य सहा जण फरार झाले आहेत. अहमदनगरच्या खंडाळा येथील शिवशक्ती क्रेशर प्लांटवर काही दिवसांपासून बंगलादेशी लोक ओळख लपवून राहत होते. एजंटला पैसे देऊन बांगलादेशहून भारतात आले होते. नाशिक एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. नगर तालुका पोलीस ठाण्यात दहा जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य फरार सहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. नाशिक एटीएस आणि नगर तालुका पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
खंडाळ येथील शिवशक्ती क्रेशर प्लांटवर काही दिवसांपासून काही बांगलादेशी नागरिक ओळख लपवून राहत असल्याची माहिती नाशिक एटीएसला मिळाली होती. त्यानुसार नाशिक एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने या क्रेशरवर छापा टाकला. यावेळी चार बांगलादेशी नागरिक येथे काम करताना आढळून आले. चार जणांकडे चौकशी केली असता बनावट कागदपत्र आणि पासपोर्ट आढळून आले. मोहीनूद्दीन नाजीम शेख, शहाबुद्दीन जहागिर खान, दिलावर खान सीराज ऊल्लह खान, शहापरान जहागिर खान अशी अटक बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. आरोपींविरोधात अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 467, 468, 471 तसेच भारतामध्ये प्रवेश 3(A) 6(A) 14 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून बनावट पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान, नगरमध्ये बांगलादेशी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे बांगलादेशी नगरमध्ये का आले?, ओळख लपवून का राहत होते? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.


