मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत युती त्यांनीच तोडली असा आरोप केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. इतकेच नाही तर शरद पवार यांच्याबाबत मोदींनी केलेल्या दाव्यावरही त्यांनी टीका केली आहे. शरद पवार यांना काँग्रेसने पंतप्रधान होण्यापासून रोखले असल्याचे मोदी म्हणाले होते. यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. युती तोडल्याचा फोन खडसेंनी उद्धव ठाकरेंना केला होता. 2014 मध्ये युती कोणी तोडली, हे मोदींनी तपासावे असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी दिला. युती तोडण्याच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा राऊत यांनी समाचार घेतला.
शरद पवार यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का? असे आम्ही म्हणालो का? हा त्यांचा पक्षाचा पश्न असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले की, पवारांबाबत आदर आहे म्हणून त्यांचा पक्ष फोडला का? पंतप्रधान पदापासून पवारांना काँग्रेसने रोखले, मग अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सामना या वृत्तपत्राची दखल घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले. यावरुन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे महत्त्व अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला. खासदार संजय राऊत यांनी संसदेच्या अधिवेशनात सुरू असलेल्या मणिपूरच्या मुद्यावरही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.