नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. मणिपुरात गेल्या 24 तासांत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी 4 ऑगस्ट रात्री मेईतेई समुदायाच्या तीन लोकांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर समुदायाच्या काही लोकांनी अनेक घरांना आग लावली आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याने मणिपूर रायफल्सचा एक जवानही शहीद झाला, असं अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं. एवढंच नाही तर जमावानं बिष्णुपूरमधील कीरेनफाबी आणि थंगलावई येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा लुटला. जमावानं 235 असॉल्ट रायफल, 21 सब-मशीन गन, 16 पिस्तूल, 9,000 गोळ्या आणि 124 हँडग्रेनेडसह शस्त्रं आणि दारूगोळा लुटला. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी कुकी गट, इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम ने हिंसाचारात बळी पडलेल्या 35 जणांच्या मृतदेहांचे सामूहिक दफन करण्याची घोषणा केल्यानंतर या भागात तणाव वाढला आहे.
3 ऑगस्ट रोजी दुसर्या घटनेत बिष्णुपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुगकचाओ युनिटमध्ये शेकडो लोक जमले होते. यानंतर हल्लेखोरांना हाताळण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये 347 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मणिपूरमधील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.