तीन महिन्यांपूर्वी पळून जावून पाटणा देवी येथे केला होता प्रेम विवाह : घातपात असल्याचा माहेरकडील नातेवाईकांचा आरोप
पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये तीन दिवसांपूर्वी राहण्यास आलेल्या १९ वर्षाच्या नवविहितेने घरामागे असलेल्या ५० फुट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक धनंजय वेरुळे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक विजया विसावे यांनी भेट दिली. पती पत्नीत किरकोळ वाद झाला व आजी सासू, सासू चुलत सासू त्रास देत असल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी असलेला राहुल चव्हाण याचा प्रेम विवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. कुऱ्हाड येथे नांदवयासाठी आल्यानंतर काजल हिस सुग्राबाई बद्री चव्हाण (आजी सासु), मुक्ताबाई रामधन चव्हाण (सासु), पार्वतीबाई चव्हाण (चुलत सासु) ह्या सतत टोचून बोलत असल्याने त्यांच्यात वाद होत असे. यामुळे राहुल व काजल हे १० जुलै रोजी सोमवारी पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये राहण्यासाठी आले होते.
राहुल व काजल यांच्यात बुधवारी दुपारी किरकोळ वाद झाला त्यानंतर काजल ही कुणास काही एक न सांगता घरातून निघून गेली. दरम्यान राहुलने तिच्या माहेरच्या व त्याच्या कुऱ्हाड येथील आई वडीलांना भ्रमणध्वनी द्वारे कळविल्यानंतर तिचे काका व चुलत भाऊ त्याच्या पाचोरा येथील घरी आले. मात्र राहुलच्या आई वडीलांनी तुमचे तुम्ही बघून घ्या असे सांगून येण्यास नकार दिला होता. काही तासांनंतर राहुल व काजल यांच्यात भ्रमणध्वनी द्वारे संपर्क झाला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार काजल ही रात्री दहा वाजता परत आल्यानंतर तिच्या जवळ जळगाव येथील येण्या जाण्याचे तिकडे आढळून आले. काजल घरी आल्यावर राहुल याने त्याच्या घरच्यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले असतांना सासरच्या मंडळीचा बोलण्याचा रोष तीने भ्रमणध्वनी द्वारे ऐकल्यावर त्याचवेळी घरामागील पन्नास फुट खोल असलेल्या निमुळत्या विहिरीत उडी घेतली.
यावेळी घरातील बसलेले तीचे पती राहुल व उपस्थितीत असलेल्या मंडळीला विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज आला त्यांनी विहिरीजवळ जावून पाहिले असता विहिरीत काजल हिने उडी घेतल्याचे निष्पन्न झाले. विहीर अतीशय निमूळती व विहीरीचा व्यास कमी असल्याने तिच्या डोक्याला जबरी मार लागल्याने काजल हिचा जागेवरच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती कळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने काजल हीस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी काजल हीस मृत घोषित केले.
काजल हिच्या वडीलांचे दहा वर्षांपासून निधन झाले असल्याने तिचे १२ वी पर्यंत शिक्षण व संगोपन तिच्या मालखेडा ता. जामनेर येथील मामाने पुर्ण केले. काजल हिचा पती राहुल राठोड हा पाचोरा येथील एका स्टाईलच्या दुकानात १५ हजार रुपये महिन्याने काम करीत होता. काजल ही त्यांच्या चुलत मामांची मुलगी आहे.
दरम्यान काजल हीस ५० हजार रुपये महिन्याचे दुसरे स्थळ चालून आल्याने तिच्या माहेरच्या मंडळींचे मत परिवर्तन झाल्याने त्यांनी दुसऱ्या मुलाशी विवाह लावून देण्याचे ठरविले होते. याची कानघून काजल व राहुल यांना लागल्याने दोघांनी ऐकमेकांशी संपर्क करुन दोघांनी तीन महिन्यांपूर्वी चाळीसगाव येथील पाटणादेवी येथे पळून जावून प्रेमविवाह केला होता.
काजल हिच्या आईने पाचोरा येथे तिचा मृतदेह पाहिल्यावर एकच आक्रोश केला. मयत काजल हिचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया विसावे ह्या करीत आहेत.